14
इकुन्यामध्ये पौल व बर्णबा
पौल व बर्णबा इकुन्या शहरात गेले, ते तेथील यहूदी सभास्थानात गेले, तेथील लोकांशी ते बोलले, पौल व बर्णबा अशा रीतीने बोलले की, पुष्कळ यहूदी लोकांनी व ग्रीक लोकांनी त्यांनी जे सांगितले त्यावर विश्वास ठेवला. परंतु काही यहूदी लोकांनी विश्वास ठेवला नाही, त्यांनी परराष्ट्रीय लोकांची मने भडकाविली आणि बंधुजनांविषयीची मने वाईट केली. म्हणून पौल व बर्णबाने त्याठिकाणी बरेच दिवस मुक्काम केला आणि परमेश्वराच्या बलाने येशूविषयी धैर्याने सांगत राहीले, पौल व बर्णबाने देवाच्या कृपेविषयी साक्ष दिला, परमेश्वराने त्यांना पौल व बर्णबाला चमत्कार व अद्भूते कृत्ये करण्यास मदत करून ते जे काही सांगत होते ते खरे ठरवले. परंतु शहरातील काही लोकांस यहूदी लोकांची मते पटली, दुसऱ्या लोकांस प्रेषित पौल व बर्णबाचे म्हणणे पटले, त्यामुळे शहरात दोन तट पडले. काही परराष्ट्रीय लोक, काही यहूदी लोक व त्यांचे पुढारी यांनी पौल व बर्णबाला बांधले व इजा करण्याचा प्रयत्न केला, त्यांना पौल व बर्णबा यांना दगडमार करून मारावयाचे होते. पौल व बर्णबा यांना जेव्हा त्याविषयी कळले तेव्हा त्यांनी ते शहर सोडले, ते लुस्र व दर्बे या लुकवनिया देशाच्या नगरात गेले आणि त्या शहरांच्या सभोवतालच्या परिसरात गेले. आणि तेथे त्यांनी सुवार्ता सांगितली.
लुस्र येथे पौल व बर्णबा
लुस्र येथे एक मनुष्य होता त्याचे पाय अधू होते तो जन्मतःच पांगळा जन्मला होता व कधीच चालला नव्हता. पौल भाषण करीत असताना हा मनुष्य ऐकत होता, पौलाने त्याच्याकडे दृष्टी लावून व त्यास आपण बरे होऊ असा त्या मनुष्याचा विश्वास आहे असे पाहून. 10 मोठ्याने म्हणाला, “तुझ्या पायांवर नीट उभा राहा!” तेव्हा त्या मनुष्याने उडी मारली आणि चालू लागला. 11 पौलाने केलेले लोकांनी जेव्हा पाहिले, तेव्हा ते आपल्या लुकवनिया भाषेत ओरडले, ते म्हणाल, “देव मनुष्यांच्या रूपाने आमच्यात उतरले आहेत.” 12 लोकांनी बर्णबाला ज्यूपितर म्हटले व पौलाला मर्क्युरी म्हटले, कारण पौल मुख्य बोलणारा होता. 13 ज्यूपितरचे मंदिर जवळ होते, या मंदिराचा पुजारी काही बैल व फुले घेऊन वेशीजवळ आला, पुजारी व लोकांस पौल व बर्णबा यांची उपासाना करण्यासाठी त्यांच्यापुढे बळी द्यावयाचा होता. 14 परंतु ते काय करीत आहेत, हे जेव्हा प्रेषित पौल व बर्णबा यांना समजले तेव्हा त्यांनी आपले कपडे फाडले व लोकांच्या गर्दीत शिरले आणि मोठ्याने म्हणाले. 15 लोकांनो, या गोष्टी तुम्ही का करीत आहात? आम्ही देव नाही! तुम्हास जशा भावना आहेत, तशाच आम्हासही आहेत! आम्ही तुम्हास सुवार्ता सांगायला आलो, आम्ही तुम्हास हे सांगत आहोत की या व्यर्थ गोष्टींपासून तुम्ही तुमचे मन वळवावे, खऱ्या जिवंत देवाकडे आपले मन लावावे, त्यानेच आकाश, पृथ्वी, समुद्र व जे काही आहे ते निर्माण केले. 16 भूतकाळात, देवाने सर्व राष्ट्रांना त्यांना जसे पाहिजे तसे वागू दिले. 17 परंतु देवाने अशा गोष्टी केल्या, की त्याद्वारे तो खरा आहे हे सिद्ध व्हावे, तो तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी करतो, तो तुम्हास आकाशातून पाऊस देतो, योग्यवेळी तो तुम्हास चांगले पीक देतो, तो तुम्हास भरपूर अन्न देतो व तो तुमची अंतःकरणे आनंदाने भरतो. 18 पौल व बर्णबाने या गोष्टी लोकांस सांगितल्या व मोठ्या प्रयासाने आपणास यज्ञ अर्पिण्यापासून त्याना परावृत्त केले.
19 नंतर अंत्युखिया व इकुन्या येथील काही यहूदी लोक तेथे आले, त्यांनी लोकसमुदायाची मने आपल्या बाजूस वळविली आणि पौलाला दगडमार केला, त्यामध्ये पौल मरण पावला असे समजून त्यांनी त्यास ओढत नेऊन नगराबाहेर टाकले. 20 पण शिष्य पौलाभोवती जमा झाल्यावर पौल उठून परत शहरात गेला व दुसऱ्या दिवशी बर्णबाबरोबर तो दर्बे शहरास गेले.
अंत्युखियास परतणे
21 आणि त्या नगरात त्यांनी सुवार्ता सांगून अनेक लोकांस शिष्य केले, त्यानंतर ते लुस्र, इकुन्या आणि अंत्युखिया नगरांना परत आले. 22 आणि त्यांनी तेथील शिष्यांना येशूवरील विश्वासात बळकट केले, त्यांनी आपल्या विश्वासांत अढळ रहावे म्हणून उत्तेजन दिले, ते म्हणाले, “अनेक दुःखांना तोंड देत आपण देवाच्या राज्यात प्रवेश केला पाहिजे.” 23 पौल व बर्णबाने प्रत्येक मंडळीत वडीलजनांची नेमणूक केली, त्यांनी या वडिलांसाठी उपवास आणि प्रार्थना केल्या, प्रभू येशूवर विश्वास असलेले असे सर्व वडीलजन होते म्हणून पौलाने व बर्णबाने त्यांना प्रभूच्या हाती सोपवले. 24 पौल आणि बर्णबा पिसिदिया प्रदेशातून गेले नंतर ते पंफुलिया येथे आले.
25 त्यांनी पिर्गा शहरात देवाचा संदेश दिला नंतर ते अत्तलिया शहरात गेले. 26 नंतर तेथून पुढे पौल व बर्णबा सिरीया प्रांतातील अंत्युखियात समुद्रमार्गे गेले, जे काम त्यांनी पूर्ण केले होते त्याची सुरुवात त्यांनी देवाच्या कृपेने अंत्युखियापासूनच केली होती. 27 ते जेव्हा तेथे पोहोचले, तेव्हा त्यांनी मंडळीला एकत्र बोलावले आणि देवाने त्यांच्याबाबतीत ज्या ज्या गोष्टी केल्या त्या त्यांना सांगितल्या तसेच दुसऱ्या देशातील परराष्ट्रीय लोकांमध्ये देवाने विश्वासाचे द्वार कसे उघडले ते सांगितले. 28 नंतर ते विश्वास ठेवणाऱ्यांबरोबर तेथे बरेच दिवस राहिले.