29
जर एखाद्या मनुष्यावर खूप दोष असूनही, जो आपली मान ताठ करतो,
तो अचानक तुटतो आणि त्यावर काही उपाय चालत नाही.
जेव्हा नीतिमानाची वाढ होते, लोक आनंदित होतात,
पण जेव्हा दुर्जन अधिकार चालवतात तेव्हा लोक शोक करतात.
ज्या कोणाला ज्ञानाची आवड आहे तो आपल्या पित्याला आनंदित करतो,
पण जो कोणी वेश्येशी सोबत करतो तर तो आपल्या संपत्तीचा नाश करतो.
राजा न्यायाने देश दृढ करतो,
पण जो कोणी लाचेची मागणी करतो तो त्याचे वाटोळे करतो.
जो कोणी मनुष्य आपल्या शेजाऱ्याची फाजील स्तुती करतो,
तो त्याच्या पावलासाठी जाळे पसरतो.
दुष्ट मनुष्य आपल्या स्वतःच्या पापाने पाशात पडतो,
पण नीतिमान गाणे गाऊन आनंदित होतो.
नीतिमान गरिबांच्या वादासाठी विनंती करतो;
दुर्जनाला तो समजण्याची बुद्धी नसते.
थट्टा करणारे शहराला पेटवतात;
पण सुज्ञजन क्रोधापासून दूर निघून जातात.
जर सुज्ञ मनुष्याचा मूर्खाशी वाद असला तर,
मुर्ख रागावला किंवा हसला तरी काही स्वस्थता नसते.
10 रक्तपिपासू सात्विकाचा द्वेष करतात,
आणि सरळ मनुष्यास ठार मारण्यासाठी ते त्याचा शोध घेतात.
11 मूर्ख आपल्या मनातील सारा राग प्रगट करतो,
पण शहाणा मनुष्य तो आवरून धरतो आणि शांत राहतो.
12 जर अधिकाऱ्याने खोट्या गोष्टींकडे लक्ष दिले,
तर त्याचे सगळे अधिकारी वाईट होतात.
13 गरीब मनुष्य आणि जुलूम करणारा या दोघांमध्ये एक गोष्ट समान आहे;
परमेश्वर दोघांच्याही डोळ्यांना दृष्टी देतो.
14 जर राजाने गरीबांचा न्याय सत्याने केला,
तर त्याचे राजासन सर्वकाळ स्थापित होईल.
15 छडी आणि सुबोध ज्ञान देतात,
पण मोकळे सोडलेले मूल आपल्या आईला लाज आणते.
16 जेव्हा दुष्ट वाढतात, तेव्हा अपराध वाढतात;
पण धार्मिकांना त्यांचे वतन पाहावयास मिळते.
17 आपल्या मुलाला शिस्त लाव आणि तो तुला विसावा देईल
आणि तो तुझा जीव आनंदित करील.
18 जेथे कोठे भविष्यसूचक दृष्टांत न झाल्यास लोक अनावर होतात,
पण जो कोणी नियम पाळतो तो सुखी होतो.
19 दास शब्दाने सुधारत नाही,
कारण जरी त्यास समजले तरी तो प्रतिसाद देणार नाही.
20 कोणी आपल्या बोलण्यात उतावळा आहे अशा मनुष्यास पाहतोस काय?
तर त्याच्यापेक्षा मूर्खाविषयी अधिक आशा आहे.
21 जर कोणी आपल्या दासास बालपणापासून लाडाने वाढवले
तर त्याच्या शेवटी तो त्रासदायकच होईल.
22 रागावलेला मनुष्य संकटे आणतो;
आणि क्रोधी मनुष्याकडून पुष्कळ अपराध घडतात.
23 गर्व मनुष्यास खाली आणतो,
पण जो कोणी विनम्र आत्म्याचा असतो त्याचा आदर होतो.
24 जो कोणी चोराचा भागीदार होतो, तो स्वतःचाच शत्रू आहे;
ते शपथेखाली ठेवले जातात आणि ते काहीच बोलू शकत नाही.
25 मनुष्याची भीती पाशरूप होते,
पण जो कोणी परमेश्वरावर विश्वास ठेवतो तो सुरक्षित राहतो.
26 पुष्कळजन अधिपतीची मर्जी संपादण्याचा शोध करतात,
पण परमेश्वरच लोकांचा न्याय करतो.
27 अप्रामाणीक मनुष्याचा धार्मिकाला वीट येतो;
आणि सरळमार्गी मनुष्याचा दुष्टाला वीट येतो.