11
शहाण्याचे आचरण
आपली भाकर जलावर सोड*.
कारण पुष्कळ दिवसानी तुला ते पुन्हा मिळेल.
तू सात आठ लोकांस वाटा दे.
कारण पृथ्वीवर कोणत्या वाईट गोष्टी घडतील त्याची तुम्हास कल्पना नाही.
जर ढग पावसाने पूर्ण भरलेले असतील;
तर ते पृथ्वीवर स्वतःला रिक्त करतात,
आणि जर झाड उत्तरेकडे वा दक्षिणेकडे पडले तर ते जेथे पडले तेथेच राहील.
जो वारा पाहत राहतो तो पेरणार नाही.
जो ढगांचा रंग पाहत राहतो तो पेरणी करणार नाही.
जसा वारा कोठून येतो हे तुला माहित नाही,
आईच्या गर्भात बाळाची हाडे कशी वाढतात हेही जसे तुला कळत नाही
तसेच सर्व काही निर्माण करणाऱ्या देवाच्या कार्याचे आकलन तुला करता येणार नाही.
सकाळीच आपले बी पेर, संध्याकाळीही हात आवरू नकोस.
कारण त्यातून कोणते फळास येईल हे किंवा ते
अथवा दोन्ही मिळून चांगले होतील हे तुला माहीत नसते.
प्रकाश खरोखर गोड आहे,
आणि सूर्य पाहणे डोळ्यांस आनंददायक गोष्ट आहे.
जर मनुष्य कितीही वर्षे जगला तरी तो त्या सर्वात आनंद करो,
पण तो येण्याऱ्या अंधकाराच्या दिवसाचा विचार करो,
कारण ते पुष्कळ होतील.
जे सर्व येते ते व्यर्थच आहे.
तरुण पिढीस बोध
हे तरुणा, तू आपल्या तारुण्यात आनंद कर.
तुझ्या तारुण्याच्या दिवसात तुझे हृदय तुला आनंदीत करो,
आणि तू मनास वाटेल त्या मार्गाने व नजरेस येईल तसा चाल.
पण या सर्वाबद्दल देव तुझा न्याय करील. हे तुझ्या लक्षात असू दे.
10 यास्तव आपल्या मनातून राग दूर कर,
आणि आपल्या शरीरातील वेदनेकडे लक्ष देऊ नको.
कारण तारुण्य व सामर्थ्य ही व्यर्थ आहेत.
* 11:1 उदारतेने इतरांस दे