7
हामानाचे कारस्थान उधळले जाते व तो फाशी जातो
तेव्हा राजा आणि हामान राणी एस्तेरकडे मेजवानीला गेले. मेजवानीच्या या दुसऱ्या दिवशी, ते द्राक्षरस घेत असताना, राजाने पुन्हा एस्तेरला विचारले, एस्तेर राणी, “तुझी विनंती काय आहे? ती मान्य केली जाईल. तुझी मागणी काय आहे? ती अर्ध्या राज्याएवढी असली तरी ती मान्य करण्यांत येईल.”
तेव्हा एस्तेर राणी म्हणाली, “राजा, माझ्यावर आपली कृपादृष्टी झाली असून आपली मर्जी असेल तर मला व माझ्या लोकांसही जिवदान द्यावे. एवढेच माझे मागणे आहे. कारण, आमचा नाश होण्यासाठी, मारले जाण्यासाठी व नाहीसे व्हावे यासाठी मी आणि माझे लोक विकले गेलो आहोत. आमची नुसती गुलाम म्हणून विक्री झाली असती तरी मी गप्प राहिले असते. तरी त्या शत्रूला राजाची हानी भरून देऊ शकले नसते.” तेव्हा राजा अहश्वेरोशाने राणी एस्तेरला विचारले, “असे तुमच्या बाबतीत धाडस करणारा मनुष्य कोण व तो कोठे आहे?”
एस्तेर म्हणाली, “तो आपल्या समोरच आहे. हाच तो दृष्ट हामान आमचा शत्रू!” तेव्हा राजा आणि राणीसमोर हामान भयभीत झाला. राजाला अतिशय संताप आला. द्राक्षरस तसाच टाकून तो उठला आणि बाहेर राजबागेत गेला, पण हामान आपले प्राण वाचवण्याची याचना करत आत राणी एस्तेरजवळ उभा राहिला. राजाने आपले वाईट करण्याचे ठरवले आहे असे त्याने पाहिले.
मग जेथे द्राक्षरस दिला गेला होता त्या दालनामध्ये, राजा बागेतून येऊन उभा राहिला मेजवानीच्या, ज्या आसनावर एस्तेर बसली होती त्यावर हामानाला पडताना राजाने पाहिले. तेव्हा संतापून राजा म्हणाला, “मी घरात असतानाच राणीवर जबरदस्ती करणार आहेस की काय?” राजा असे म्हणाल्याबरोबर सेवक आत आले आणि त्यांनी हामानाचे तोंड झाकले.
नंतर हरबोना नावाचा राजाच्या सेवकातील एक अधिकारी, म्हणाला “ज्या मर्दखयाने राजाचे रक्षण करण्यासाठी खबर दिली होती त्याच्यासाठी हामानाच्या घराजवळ पन्नास हात उंचीचा खांब उभारला आहे.” राजा म्हणाला “त्याच खांबावर त्यास फाशी द्या.” 10 तेव्हा मर्दखयासाठी उभारलेल्या खांबावर हामानाला फाशी देण्यात आली. मग राजाचा क्रोध शमला.