34
देवाच्या न्याय्यत्वाचे अलीहू समर्थन करतो
नंतर अलीहूने आपले बोलणे चालूच ठेवले तो म्हणाला,
“शहाण्या मनुष्यांनो मी काय सांगतो ते ऐका
हुशार मनुष्यांनो, माझ्याकडे लक्ष द्या.
तुमची जीभ ज्या अन्नाला स्पर्श करते त्याची चव तिला कळते
आणि तुमच्या कानांवर जे शब्द पडतात ते त्यांना पारखता येतात.
तेव्हा आपण आता काय न्याय आहे ते निवडून घेवू
काय चांगले आहे ते आपण सगळ्यांनी बरोबर शिकू या.
ईयोब म्हणतो, मी निष्पाप आहे,
आणि देव माझ्याबाबतीत न्यायी नाही.
मी निरपराध आहे, परंतु माझ्याविरुध्द लागलेला निकाल मला खोटारडा ठरवतो
मी निरपराध असूनही मला खूप कष्ट भोगायला लागले.
ईयोबासारखा आणखी कोणी आहे का?
जो निंदा पाण्याप्रमाणे प्राशन करतो.
तो जे वाईट करतात त्यांच्याशी मैत्री करतो,
आणि त्यास दुष्टांबरोबर राहायला आवडते,
तो असे म्हणतो, ते मनुष्याच्या कामाचे नाही,
जर देवाला खुश करायला लागला तर त्यास त्यापासून काहीही मिळणार नाही.
10 तुम्हास समजू शकते, म्हणून तुम्ही माझे ऐका.
देव कधीही दुष्टाई करणार नाही.
तो सर्वशक्तिमान कधीच पाप करणार नाही.
11 एखादा मनुष्य जे काही करतो त्याबद्दल देव त्याची परतफेड करीतो.
देव लोकांस त्यांच्या लायकीप्रमाणे देतो
12 खरोखर, हे देव कधीच वाईट करीत नाही,
तो सर्वशक्तिमान कधीच न्यायाला विरोध करीत नाही.
13 देवाला कोणीही पृथ्वीवरचा अधिकारी म्हणून निवडले नाही.
सगळ्या जगाची काळजी देवावर कोणी सोपवली नाही.
14 त्याचे चित्त स्वतःकडेच असते,
आणि त्याने आपला आत्मा आणि श्वास स्वतःच्या ठायी परत घेतला
15 नंतर सर्व शरीरे एकत्रीत नाश पावतील
मनुष्य परत मातीस मिळेल.
16 जर तुम्ही शहाणे असाल तर मी काय म्हणतो त्याकडे लक्ष द्याल
माझ्या तोंडच्या शब्दाकडे कान दे
17 जो मनुष्य न्यायी होण्यासंबंधी तिरस्कार करतो तो कधीच राज्यकर्ता होऊ शकत नाही.
ईयोब, देव शक्तीमान आणि चांगला आहे. तू त्यास अपराधी ठरवू शकशील असे तुला वाटते का?
18 एक देवच असा आहे जो राजांना तुम्ही कवडीमोलाचे आहात.
आणि ‘तुम्ही दुष्ट आहात.’ असे ज्ञान्यांना म्हणतो.
19 देव इतरांपेक्षा पुढाऱ्यांवर अधिक प्रेम करीत नाही.
देव गरीब मनुष्यापेक्षा श्रीमंतांवर अधिक प्रेम करत नाही?
कारण ते सर्व त्याच्या हाताची कृती आहेत.
20 माणसे अर्ध्यारात्री एकाएकी मरुन जातात.
ते आजारी पडतात आणि मरतात.
अगदी शक्तीशाली लोकसुध्दा, कारण नसताना मरतात.
21 लोक जे करतात ते देव बघतो
देव मनुष्याची प्रत्येक हालचाल बघत असतो.
22 जगात कुठेही अशी अंधारी जागा नाही जिथे वाईट माणसे देवापासून लपून बसू शकतील.
23 देवाला लोकांची अधिक परीक्षा घेण्यासाठी वेळ ठरवण्याची गरज नसते
लोकांचा न्यायनिवाडा करण्यासाठी त्यांना समोर आणण्याची गरजही देवाला भासत नाही.
24 शक्तीशाली लोकांचा तो चुराडा करतो, आणि त्यांच्या स्थानी दुसरा स्थापीतो,
त्यास त्यांना प्रश्न विचारण्याची गरज वाटत नाही.
25 तेव्हा लोक काय करतात ते देवाला माहीत असते.
म्हणूनच देव रात्रीतून दुष्टांना पराभव करतो आणि त्यांचा नि:पात करतो.
26 वाईट मनुष्यांनी जी दुष्कृत्ये केली असतील त्याबद्दल त्यांना शिक्षा करतो.
आणि जिथे इतर त्यांना पाहू शकतील अशा ठिकाणी देव त्यांना शिक्षा करतो.
27 कारण वाईट मनुष्यांनी देवाची आज्ञा पाळायचे थांबवले
आणि देवाला हवे ते करण्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले.
28 हे दुष्ट लोक गरीबांना कष्ट देतात, आणि मदतीसाठी देवाकडे याचना करायला भाग पाडतात.
दिनांची आरोळी त्याच्या कानी गेली.
29 देव गरीबांची मदतीसाठी हाक ऐकतो. परंतु गरीबांना मदत करायची नाही असे देवाने ठरवले तरी देवाला कोणी अपराधी ठरवू शकणार नाही.
देवाने जर लोकांपासून लपून राहायचे असे ठरवले तर कोणालाही तो सापडू शकणार नाही
म्हणजे कोणीही लोकांस पिजंऱ्यात पकडू शकणार नाही.
30 अशासाठी की, अधर्म्याचे राज्य येवू नये,
म्हणजे लोकांस कोणी जाळ्यात अडकवू नये.
31 जर तो मनुष्य देवाला म्हणेल की.
मी अपराधी आहे. यापुढे मी पाप करणार नाही.
32 जे मी बघू शकत नाही ते मला दाखव.
मी जरी पाप केले असेल तरी मी ते पुन्हा करणार नाही.
33 तुला असे वाटते का देव त्या मनुष्याचा पापाला शिक्षा करील, देवाने आतापर्यंत केलेले तुला आवडले नाही?
हा तुझा निर्णय आहे. माझा नाही.
तुला काय वाटते ते मला सांग.
34 शहाणा मनुष्य मला म्हणेल
खरोखर, प्रत्येक शहाणा मनुष्य जो माझे ऐकतो तो म्हणेल,
35 ‘ईयोब एखाद्या अज्ञानी मनुष्यासारखे बोलत आहे.
तो जे काही बोलतो ते अर्थहीन आहे.’
36 जर फक्त ईयोबालाच त्याच्या वादाबद्दल कसोटीस लावत असू
कारण तो एखाद्या दुष्ट मनुष्यासारखे बोलत आहे.
37 त्याच्या पापात त्याने आणखी बंडाची भर घातली आहे.
तो टाळी वाजवितो आमच्या मध्ये थट्टा करतो
देवाविरूद्ध अनेक शब्द बोलतो.”